पलार नदीकाठी वसलेले वेल्लोर शहर


दक्षिण भारतात पर्यटनाच्या दृष्टीकोनातुन पहाण्यासारखी अनेक सुंदर अशी स्थळे आहेत. परंतु प्राचीन शहर वेल्लोर चे महत्व जरा आगळे वेगळेच आहे. पलार नदीच्या काठावर वसलेले हे शहर येथील किल्ल्यासाठी, मंदिरांसाठी आणि जवळच असलेल्या येल्गिरी या छोट्याश्या हिलस्टेशनसाठी अवश्य भेट द्यावे असे आहे.


वेल्लोरचा प्रसिद्ध किल्ला १६ व्या शतकात भोमी थिम्मा रेड्डी यांनी विजयनगरचा राजा कृष्णदेवराय याच्या कारकिर्दीत ग्रानाइटमध्ये बांधलेला असून त्याच्याभोवती पाण्याने भरलेला खंदक आहे. पूर्वी या खंदकात मगरी आढळत असत.  तद्पश्चात तो आदिलशहाने जिंकला त्यानंतर मराठे आणि मग ब्रिटीश याच्या ताब्यात हा किल्ला होता. ब्रिटिशानि टिपू सुलतान आणि श्रीलंकेचा राजा विक्रम राजसिंग यांना या किल्ल्यात बंदी म्हणून ठेवले होते असा इतिहास आहे. १३३ एकर परिरसरात हा किल्ला पसरला असून येथे जलकंठेश्वर मंदिर, मशीद आणि चर्च तसेच एक संग्रहालय आहे.


वेल्लोर पासून जवळच येल्गिरी हे छोटेसे हिल स्टेशन आहे. एकंदर हा आदिवासी इलाका असून येथील प्राचीन मंदिरे, आदिवासी संस्कृती आवर्जून पहावी अशी आहे. येथे साहसाची आवड असलेल्यांना पॅराग्लायडिंगची मजा लुटता येते. चारी बाजूनी हिरव्यागार पर्वतांनी वेढलेले हा भाग असून येथे दरवर्षी आंतरराष्ट्रीय पॅराग्लायडिंग फेस्टिवलचे आयोजन केले जाते. या भागात वर्षभर हवा खुशनुमार असते त्यामुळे कधीही येथे जाता येते.

अशीच अनेक भारतातील पर्यटनस्थळे घेऊन आगळी  वेगळी दुनिया हा ब्लॉग तुमच्या भेटीला येत राहील. तुमचे प्रेम निरंतर या ब्लॉगवर असेच राहु दे.

No comments:

Post a Comment